पुणे : कसबा पेठ व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा दि.18 जानेवारी रोजी करण्यात आली. त्याचदिवसापासून आचारसंहिताही लागू झाली. त्याला आता 6 दिवस होत असताना कसबा परिसरात राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनीधींचे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर तसेच असून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच विविध विकासकामांवर खासदार, आमदार आणि नगरसेवक यांची नावे असून ते फलक अद्यापही झाकलेले नाहीत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी फक्त कागदावरच राहिली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करता येत नाही. तसेच मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कामे अथवा घोषणा करता येत नाहीत. याबरोबरच आचारसंहिता लागू असलेल्या क्षेत्रामध्ये लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांवर असेल फलकसुद्धा झाकावे लागतात. बसथांबे, रस्त्यांवरील चौकात लावलेले उद्घाटनाचे फलक, संकल्पना यावर नगरसेवकांची नावे आहेत.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात असे अनेक फलक आहे. मात्र हे फलक अजूनही झाकण्यात आलेले नाहीत. जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. दुसऱ्या बाजूला आचारसंहिता लागू झाल्याचे किंवा त्याबाबत प्रशासकीय पातळीवर काही हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहितेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची असते. यानुसार शहरात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही महापालिका आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांची आहे. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांकडून ही कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकही संभ्रमात आहेत.