पुणे : लॉकडाऊनचा फटका नारळ उलाढालीला बसला आहे. एप्रिल, मे महिन्यात यात्रा, सण, लग्नसराई, हॉटेल्स, विविध समारंभ कार्यक्रमांवर बंधने आल्यामुळे यंदा नारळाची उलाढाल निम्म्याहून अधिक प्रमाणात घटली आहे.
सध्या बाजारात आवकही 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. केवळ 20 टक्केच मागणी आहे. परिणामी, दोन महिन्यांच्या तुलनेत सर्व प्रकारच्या नारळ भावात शेकडा 500 रुपयांनी घट झाली आहे. आखाड महिन्यात नारळाला मागणी वाढून उलाढाल वाढण्याची अपेक्षा नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी वर्तविली आहे.
आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतून मार्केट यार्डातील भुसार विभागात नारळाची आवक होते. धार्मिक कार्यक्रमांमध्ये पूजा आणि तोरणासाठी नव्या नारळाला मागणी राहाते. तर, हॉटेल व्यावसायिकांकडून मद्रास आणि सापसोल नारळाला मोठी मागणी असते. येथील बाजारात इतरवेळी दररोज सुमारे दीड ते पावणेदोन लाख नारळाची आवक होत असते. करोनामुळे ही आवक निम्म्यावर म्हणजे 70 ते 75 हजारांवर आली आहे. दररोज साधारण दीड ते दोन लाख नारळाची शहर आणि उपनगरांतून मागणी असते. तर सण, समारंभाच्या काळात हीच मागणी दोन ते अडीच लाखांवर जाते.
घाऊक बाजारातील नारळाचा शेकडा भाव
नवा नारळ 1350 ते 1450
पालकोल 1450 ते 1500
मद्रास 2300 ते 2600
सापसोल 1600 ते 2500