नवी दिल्ली – देशभरात विजेची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रांमध्ये वीजनिर्मितीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या समस्येचा सामना करण्यासाठी आता रेल्वे मंत्रालयाने पुढील 20 दिवसांसाठी 1100 पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर प्रवाशांसह व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औष्णिक वीज केंद्राला कोळसा पुरवणाऱ्या मालगाड्यांना मार्ग देण्यासाठी प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील एक महिन्यासाठी रेल्वेने 670 पॅसेंजर गाड्या आधीच रद्द केल्या आहेत. त्यानंतर आता आणखी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन सुटीच्या दिवसांमध्ये रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या वर्षीपासून कोळशाच्या मागणीत आणि वापरात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल 2021 च्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये 15 टक्के जास्त कोळशाची वाहतूक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोळशाची मागणी आणि वापर लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे कोळशाची अधिक प्रमाणात वाहतूक होत असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके त्रिपाठी यांनी म्हटले आहे.
मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत अतिरिक्त कोळसा रेक अधिक प्राधान्याने चालवले जात आहेत. या मुद्द्यावर केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनीही अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याचे मत व्यक्त केले. रशिया-युक्रेन युद्धामुळे कोळशाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. याशिवाय कोळसा कंपन्यांची थकबाकी न भरल्याने आणि झारखंडमध्ये संपामुळे कोळसा संकट निर्माण झाल्याचे आर के सिंग यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा यासह अनेक राज्यांमध्ये कोळसा संकटामुळे विजेची समस्या निर्माण झाली होती. यानंतर केंद्र सरकारने अनेक बैठका घेतल्या. अनेक राज्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.