नवी दिल्ली- देशात कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. वीज निर्मिती व्यतिरिक्त इतर क्षेत्रांना कोळसा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सिमेंट ऍल्युमिनियम आणि इतर बऱ्याच क्षेत्रातील उत्पादनावर परिणाम होणार आहे.
या बाबी इतर क्षेत्रासाठी मूलभूत कच्चामाल म्हणून वापरण्यात येत असल्यामुळे आगामी वर्षांमध्ये कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील सिमेंट उत्पादकाच्या संघटनेने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशात तयार होणारा कोळसा सिमेंट उत्पादक कंपन्यांना बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सिमेंट उत्पादक कंपन्यांना आयात करण्याशिवाय पर्याय नाही.
चीनसह इतर देशांमध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्यामुळे जागतिक बाजारात कोळशाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हा महागडा कोळसा वापरल्यास सिमेंटच्या किमती वाढण्याचा धोका आहे. जागतिक बाजारात कोळसा कमी उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक देश आपल्या देशातील कोळसा स्वत:च्या देशातील उद्योगांसाठी राखून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कोळसा कमी प्रमाणात उपलब्ध राहणार आहे.
जागतिक बाजारात कोळसा नसतानाच करोनाविषयक परिस्थितीमुळे हा कोळसा देशात उपलब्ध होण्यास पुरेशी जहाजे नसल्याचाही नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. परिणामी सिमेंट उत्पादकांनी आगामी काळात सिमेंट मोठ्या प्रमाणात महाग होण्याची भीती व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार प्रति बॅगला सिमेंट उत्पादन किंमत 60 रुपयापर्यंत वाढू शकते असे या संघटनेने म्हटले आहे. सध्या कोळसा नसल्यामुळे बऱ्याच सिमेंट कारखान्यातील उत्पादन त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी होणार आहे.
ही परिस्थिती कधी निवळेल हे कोणीही सध्याच्या परिस्थितीत सांगू शकत नाही. कोळशाच्या टंचाईमुळे इतर उत्पादनेही महाग होणार आहेत. उद्योग अगोदरच करोनामुळे हैराण असताना त्यांच्यासमोर कच्च्या मालाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे हे छोटे उद्योग बंद पडत आहेत. सरकार या परिस्थितीमध्ये असाहाय्य असून फक्त वीज प्रकल्पासाठी पुरेसा कोळसा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही परिस्थिती अनेक महिने रेंगाळू शकते असे बोलले जात आहे