नवी दिल्ली – करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लागू केलेल्या संपूर्ण बंदीच्या काळात वीजनिर्मिती आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांचे कार्य अखंडित सुरू राहावे, यासाठी कोळसा पुरवठ्याचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये केला आहे अशी ग्वाही कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. या बंदीच्या काळात अतिमहत्त्वाच्या क्षेत्रांना कोळशाचा आवश्यक पुरवठा केला जाईल, यासाठी अधिक जोमाने काम करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी कोळसा मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले.
कोळशाचे पुरेसे उत्पादन, पुरवठा आणि तो योग्य ठिकाणी वेळेवर पाठविणे या सर्व टप्प्यांवर नीट लक्ष ठेवण्यासाठी कोळसा मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोज बैठका होत आहेत. देशाच्या वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये आगामी 24 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक आहे. देशातील कोळश्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक उद्योगाला तसेच वीज निर्मिती क्षेत्राला सुलभपणे कोळश्याचा पुरेसा आणि खात्रीशीर पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत अशी माहिती जोशी यांनी दिली.