नवी दिल्ली – सरकारी मालकीच्या कोल इंडिया कंपनीने देशातील वीज प्रकल्पांसाठीचा कोळसा पुरवठा गेल्या ऑगस्ट महिन्यात 11.4 टक्क्यांनी वाढवला आहे. देशातील औष्णिक वीज प्रकल्प कोळशा अभावी अडचणीत आले असताना त्यांची गरज लक्षात घेऊन कंपनीने हा कोळसा पुरवठा वाढवला आहे.
देशातील एकूण कोळसा उत्पादनापैकी 80 टक्के कोळसा उत्पादन कोल इंडिया कंपनीकडून होते. या कंपनीने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या अवधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 27.2 टक्के इतका अधिक कोळसा पुरवठा केला आहे.
देशातील अन्य खासगी कंपन्यांनीहीं कोळसा पुरवठा वाढवला असल्याने देशातील वीज उत्पादन प्रक्रियेला सध्या चांगली चालना मिळाली आहे. वीज उत्त्पादक कंपन्यांना कोळसा कमी पडू नये म्हणून त्यांना कोळशाचा साठा करण्यासही कोल इंडियाकडून सहकार्य केले जात आहे.