मुंबईत बैठक : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही साकडे
पुणे – पंजाब महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारामुळे सर्वच नागरी सहकारी बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेकडून निर्बंध घातले जात आहेत. याशिवाय ग्राहकांकडूनदेखील या बॅंकांकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे त्रासलेल्या नागरी सहकारी बॅंक प्रतिनिधींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साकडे घातले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.18) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये नागरी सहकारी बॅंकाच्या राज्यव्यापी चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे.
कोणत्याही बॅंकेतील अनियमितता उघडकीस आली, की सगळ्याच नागरी सहकारी बॅंकांकडे संशयाच्या नजरेने पाहण्याच्या आणि नवनवीन फतव्यांच्या माध्यमातून या बॅंकाची कोंडी करण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बॅंकेकडून सातत्याने केला जात आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. पीएमसी बॅंकेतील घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बॅंकने नागरी सहकारी बॅंकांवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे या बॅंकांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरी बॅंका वाचवण्याबाबत विचारविनियम करून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेविरोधात ठोस भूमिका घेण्यासाठी दी महाराष्ट्र अर्बन को-ऑप बॅंक्स फेडरेशनच्या माध्यमातून ही बैठक होत आहे. या एकदिवसीय चिंतन बैठकीत शरद पवार यांच्यासह रिझर्व्ह बॅंकेचे संचालक सतीश मराठे, राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त सतीश सोनी आदी उपस्थित राहणार आहेत.
चिंतन बैठकीत नागरी सहकारी बॅंकांवर दुहेरी नियंत्रण असावे की नसावे, मोठ्या नागरी सहकारी बॅंकांचे खाजगी बॅंकेत रुपांतर करणे, या बॅंकांना जोखीम आधारित विमा हप्ता लागू करण्याच्या रिझर्व्ह बॅंकेच्या शिफारशीबाबत भूमिका ठरविण्यात येणार आहे.