मुंबई – देशासह राज्यावर देखील कोरोना संकटाचे काळे ढग दाटले असून या रोगाचे महासाथीत रूपांतर होऊ नये यासाठी सध्या सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून देशभरामध्ये २१ दिवसांचे लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे. असं असलं तरी समाजातील काही बेजबाबदारांकडून ‘लॉक डाऊन’ची पायमल्ली करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. आता अशा महाभागांची समजूत काढण्यासाठी बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान पुढे आला असून याबाबत त्याने एका व्हिडिओद्वारे जनतेला घरामध्येच थांबण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, सलमानच्या या आवाहनाची दखल स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. सलमानने ट्विटर या सोशल मीडियावर टाकलेला व्हिडीओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून रिट्विट करण्यात आला असून जनजागृती केल्याबाबत त्याचे आभार देखील मानण्यात आले आहेत.
कोरोना या रोगाला रोखण्यासाठी त्याच्या संसर्गाची साखळी तोडणे महत्वाचे असून यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या घरातून बाहेर न पडणं योग्य ठरणार आहे. तसेच वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या सवयी देखील कोरोनापासून आपला बचाव करू शकतात.
Thank you @BeingSalmanKhan ji for the appeal ?? https://t.co/bkzutsflH1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 30, 2020