मुंबई – मुंबईची चित्रपटसृष्टी उत्तरप्रदेशात हलवण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू असल्याची जी चर्चा सुरू आहे त्याला आणखी खतपाणी घालणारी बातमी हाती आली आहे. येत्या 2 डिसेंबरला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ मुंबईला चित्रपट निर्माते आणि बॉलिवुड चित्रपट सृष्टीशी संबंधीत प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी येत आहेत.
चित्रपट निर्माते राहुल मित्रा यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले की या बैठकीसाठी माझ्यासह अनेक निर्मात्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात योगींनी उत्तरप्रदेशात दिल्ली नजिक मोठी फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने ते मुंबईत संबंधीतांशी चर्चा करणार आहेत.
सुभाष घई, बोनी कपुर, राजकुमार संतोषी, सुधीर मिश्रा, रमेश सिप्पी, तिगमांशु धुलिया, मधुर भांडारकर, उमेश शुक्ला, टी सीरीजचे प्रमुख भुषणकुमार, जयंतीलाल गडा, सिद्धार्थ रॉय कपुर, यांचाही या बैठकीसाठीच्या निमंत्रितांमध्ये समावेश आहे.
हे प्रयत्न एकीकडे सुरू असतानाच भाजपकडून मुंबईचे महत्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही सातत्याने केला जात असून योगींनी मुंबईत चित्रपटसृष्टीच्या प्रमुखांची बैठक बोलावणे ही त्याची सुरूवात असल्याचेही मानले जात आहे.