मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील कलाकारांवर चौफेर टीका करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित अमली पदार्थ रॅकेटमध्येही अनेक कलाकारांची नावे समोर आली असून त्यांची चौकशी सुरु आहे. अशातच आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूडवर केल्या जात असलेल्या आरोपांवर दुःख व्यक्त केलं.
यावेळी मुख्यमंत्र्यानी उत्तर प्रदेशात होत असलेल्या फिल्मसिटीबाबत वक्तव्य करताना, “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा परखड इशारा दिला. ते मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बोलत होते.
“मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलिवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहे. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हे एक मोठं मनोरंजन उद्योग क्षेत्र असून, या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते. तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात.”
बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचा प्रकार सहन करणार नाही – मुख्यमंत्री “परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा