पंतप्रधानांना भेटल्यानंतर ठाकरे यांच्याकडून समर्थन, आघाडीत पेच वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली : राज्याच्या गरजांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तासभर थेट स्वरूपात उत्तम चर्चा झाली. राज्याच्या हितासाठी सर्व ते सहकार्य करण्याचे वचन पंतप्रधानांनी दिले, असे सांगत सुधारीत नागरीकत्व कायदा (सीएए) कोणाच्याही विरोधात नाही, अशा शब्दात या कायद्याचे समर्थन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. राज्यात एनपीआर येऊ दे. त्यातील कलमांचा तपशील समजू दे त्यानंतर त्याबाबत निर्णय घेता येईल, असे एनपीआरचे समर्थन करत त्यांनी राज्यातील नागरिकांच्या कोणत्याही हक्कावर गदा येऊ देणार नाही, असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद याची माहिती दिली. ते म्हणाले, जीएसटीच्या निधीसाठी मी पत्र पाठवल्यानंतर पैसे येण्यास सुरवात झाली आहे. मात्र, ज्या वेगात ते येणे अपेक्षित आहे. त्या वेगात पैसे येत नाहीत. ते मिळावेत अशी मागणी पंतप्रधानांकडे केली. त्यावेळी पंतप्रधानांनी राज्याच्या हिताच्या योजनांना केंद्राकडून पाठींबा आणि सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
उत्तरे टाळली ठाकरी बाण्याचा अभाव
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सीएए कायद्याचे ठामपणे समर्थन केले. त्यानंतर त्यांनी सीएएला असणारा विरोध कमी करण्यासाठी प्रयत्न करणार का? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावेळी ज्यांनी हे आंदोलन पेटवले त्यांनी ते मिटवण्यावचा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले. त्यावेळी आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेस नेते करत होते, असे काही पत्रकारांनी सांगताच ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतला, दिल्लीत तुम्ही राहता. पेटवणारे कोण आहे, हे तुम्हाला माहित आहे असे ते म्हणाले. त्यानंतर मला सोनियांना भेटायला जायचे आहे, असे सांगत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात एनआरसी, सीएए आणि एनपीआर अशा साऱ्या विषयांवर चर्चा झाली. सीएएमध्ये घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. त्यात कोणाच्याही हिताच्या विरोधात हा कायदा नाही. शेजारील राष्ट्रांतील अल्पसंख्यांकांना नागरीकत्व देण्याची त्यात तरतूद आहे. त्यात हिंदुंचाही समावेश आहे. एनआरसी देशव्यापी होणार नाही. तो आसामपुरता मर्यादित विषय आहे. एनपीआर जनगणनेसारखी आहे. ती नेहमी होत असते. त्यात काही धोकादायक तरतुदी असतील, काही आक्षेपार्ह असेल तर त्यावेळी विरोध करू. पण त्याचे नेमके स्वरूप समोर येऊ द्या, असे ते म्हणाले.
राज्यात शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली जात आहे. याशिवाय आणखी दोन योजना राबवायच्या आहेत त्यासाठी जीएसटीमधील राज्याचा वाटा वेगाने मिळायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसबरोबर कोणत्याही मुद्यावर मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसशी कोणत्याही मुद्द्यावर मतभेद नसून आता सोनियांना भेटायला जात आहे, असे सांगत पत्रकार परिषद आटोपती घेतली.