मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील मंदिरं पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. खरमरीत रोखानं लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित केला होता. हिंदुत्वाचा विसर पडला का? असा प्रश्न राज्यपालांनी विचारला होता. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी राज्यपालाचे नाव न घेता टोला लगावला आहे. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
दरवर्षी मुंबईत शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या वतीने दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोना माहासाथीच्या संकटामुळे सर्व नियमांचं पालन करून हा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला. यावेळी मोजकेच मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केल.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “हिंदूत्ववादाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात. ज्यावेळी बाबरी पाडली तेव्हा शेपट्या घालून हे कुठं बसले होते. घंटा बडवा, थाळ्या बडवा, हे तुमचं हिंदूत्व. पण आमचं हिंदूत्व हे असलं नाही, हिंदूत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदूत्वाबद्दल काय म्हणातात ते समजून घ्यावं,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला.