ज्येष्ठ नेते पवार यांच्यामुळे शेतकऱ्यांना आशा
जळोची – शेतकऱ्यांच्या शेतीपीकांचे सध्याच्या अवकाळी पावसाने आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी राजकीय नेत्यांसह उद्धव ठाकरे यांनीही केली. या पाहणीत त्यांनी मराठवाडा पिंजून काढत शेतकऱ्यांना दिलासा दिला, त्यांच्याशी संवाद साधून राज्यभरातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी देऊ, अशी आश्वासने दिली. आता, खुद्द उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याने या आश्वासनांची पूर्तता होईल, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे बारामतीच्या शेतकऱ्यांकडे तरी विशेष लक्ष देतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या आश्वानामुळे राज्यासह बारामतीतील शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीची अपेक्षा आहे. बारामतीचे जाणते नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्यातून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. यामुळे सहाजिकच ठाकरे हे पुणे जिल्हा त्यातही बारामतीला झुकते माप देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. बावीस गावच्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना सुरवातीला कोरड्या तर त्यानंतर ओल्या दुष्काळाने आर्थिक संकटात लोटले आहे.
राज्यात सरकार स्थापनेचा कलह होत असतानाच पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पावसाने कालवाकालव केली. यामुळे हाती आलेली पीकं वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन दिवाळीच्या काळातच अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांना सणही गोड गेला नाही. पावसाच्या रेट्यात ज्वारी, बाजरी, कांदा सोयाबीन, तूर यासह डाळिंब, सिताफळ अशा फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातून बारामती तालुक्यातील शेतकरी पुरता कोलमडून पडला आहे.
राज्यपालांकडून शेतकऱ्यांना दिलासा म्हणून तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली मात्र यातून शेतकऱ्यांत समाधान पसरण्याऐवजी नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. हाच धागा पकडून राज्याचे नवे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत देतानाच सातबाराही कोरा करू, असे आश्वासन दिले. त्यातही आता मुख्यमंत्री पदावर त्यांची वर्णी लागल्याने शेतकऱ्यांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी, पिंपळी, दंड वाडी, काटेवाडी, सुपा सह आदी भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त भागात शेतीची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी करून पंचनामेही केले आहेत. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. सरकार स्थापन झाले असले तरी शेतकऱ्यांच्या दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत चिंता सतावत आहे. याकमी मुख्यमंत्री ठाकरे लवकरात लवकर निर्णय घेतील, अशी अशा व्यक्त केली जात आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या आश्वानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा
- अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना बसला मोठा फटका
ज्येष्ठ नेते शरद पवार, उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, कर्जमाफी करू, दुष्काळ आणि आताच्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन कर्जमाफी करावी. दिलेला शब्द खरा करुन दाखवावा.
– विश्वास गावडे, गुणवडी (ता. बारामती)
कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार नक्कीच शेतकऱ्यांचे हित साधेल, अशी अपेक्षा आहे. या सरकारने शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. सरकारने आपले वेगळपण दाखवून द्यावे.
– रामदास वायाळ, शेतकरी, बारामती