मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा वाद थोडा क्षमतो न क्षमतो तोच आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.प्रतापगड किल्ल्यावर आयोजित शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना भाजप नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याचे दिसून आले. यामुळे आता नवीन वादाला सुरुवात होऊ शकते.
भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली. प्रतापगडावर ‘शिवप्रताप’ दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. “औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते परंतु स्वराज्यासाठी ते बाहेर पडले आणि देशात स्वराज्याची स्थापना करू शकले… तसेच मुख्यमंत्री शिंदेंना देखील रोखण्याचे प्रयत्न झाले परंतु महाराष्ट्रासाठी ते देखील बाहेर पडले म्हणून आज उल्हास आहे”. लोढा यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं होत. आता लोढा यांनी उदाहरणासाठी म्हणून दिलेल्या या दाखल्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी मंचावर अनेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.