राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत देत राज्याच्या राजकरणात खळबळ उडवून दिली. काल रात्री उशिरा राष्ट्रवादीची एक बैठक पार पडली त्यावेळी पवारांनी शिंदे सरकार केव्हाही कोसळेल असे भाकीत वर्तवले होते. मात्र हे सरकार सुरळीत चालेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी सरकारबाबत भाष्य केलं.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. तसेच भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने त्यांच्यात देखील मोठी नाराजी आहे याचा परिणाम शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात होईल. असं म्हणत शरद पवार यांनी आमदारांना मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहायला सांगत सरकार कोसळेल असं भाकीत वर्तवलं.
मात्र हे सरकार सुरळीत चालेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे आकडा आहे, बहुमत आहे, विरोधकांकडे काय आहे ? असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच आपण कधीही मुख्यमंत्रीपदाची मागणी केली नव्हती असंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून माझी नियुक्ती केली आहे. भरत गोगोवले हेच प्रतोद आहेत. अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत. आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर अध्यक्षांनी निर्णय दिला आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
विधानसभा अध्यक्ष निवडणूक आम्ही बहुमताने जिंकली आहे. आमच्याकडे १६६ मतं आहेत. त्यांच्याकडे १०७ मतंच आहेत. हा फरक खूप मोठा असून तो दिवसेंदिवस वाढत जाईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.