प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -नागरिकांची विकास कामे जलद गतीने झाली पाहिजेत. याबरोबरचा कामाचा दर्जाही गुणवत्तापूर्ण असायला हवा आहे. कामांबाबत फायलीचा पसाराही कमी व्हायला पाहिजे. अधिकाऱ्यांनी कार्यक्षमता दाखवून कामे करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जनहिताच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री तानाजी सावंत, सर्व आमदार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे, विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. राज्य आणि केंद्रशासनाच्या योजनांचा आढावा विभागीय आयुक्त स्तरावर घेण्यात यावा. राज्यातील विविध योजनांसाठी केंद्र सरकार निधी देण्यास तयार आहे. केंद्र सरकारकडे प्रलंबित बाबी मार्गी लागण्यासाठी राज्य शासन आवश्यक पाठपुरावा करत आहे, असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले…
पूरग्रस्त भागांतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत.
शासन मदतीस कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
दरड प्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्यात.
प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधी शासन देईल