मुंबई – मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपनेते प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विधानाचा समाचार घेत आम्हाला कुणी थप्पड देण्याची भाषा करु नये. एकच अशी थापड देऊ की पुन्हा उठणार नाही, असा इशाराच दिला आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वेळ आली, तर शिवसेना भवन फोडू असे लाड यांनी म्हटल्याने शिवसेनेचे नेते संतापले आहेत. आमदार प्रसाद लाड यांच्यावर चहुबाजूने टीका होत आहे.
यापूर्वी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही, अशा इशारासुद्धा त्यांनी दिलाय.