अमृतसर – कॉंग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे हिरो आहेत आणि नेहमीच राहतील, अशी भावना त्यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी व्यक्त केली आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून लवकरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. सिद्धू यांना तो मान मिळणार का, असा प्रश्न पत्रकारांनी नवज्योत कौर यांना विचारला. त्यावर त्या उत्तरल्या, कोण मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनणार ते फार महत्वाचे नाही. सिद्धू नेहमीच हिरो राहतील. जे कुणी मुख्यमंत्री बनतील; त्यांनी मंत्र्यांना त्यांचे कार्य करू द्यायला हवे.
माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी तसे केले असते; तर कुठल्याच मुख्यमंत्र्यांविषयी कुणाला समस्या वाटली नसती, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पंजाब शाखेतील मतभेदांमुळे कॉंग्रेसने काही महिन्यांपूर्वी अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले. त्यासाठी सिद्धू जबाबदार असल्याचा आरोप अमरिंदर यांनी वारंवार केला.
आता अमरिंदर यांनी कॉंग्रेसला रामराम केल्यानंतर त्या पक्षात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. सिद्धू आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याकडे प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे.