मुंबई – राज्यातील करोनामुळे बंद ठेवण्यात आलेली मंदिरे पुन्हा उघडली जावीत, अशी सुचना करणारे एक पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. तथापि त्या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून काही आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना सडेतोड उत्तर पाठवले आहे. माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. आता यावर भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता .
याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून भाजप पक्षासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधत ‘ठाकरी दणका! एकच. पण सॉलीड मारला!’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून सडेतोड टीका करण्यात आली आहे. तुम्ही अचानक सेक्युलर झालात का? असा प्रश्न विचारत मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा शिवसेनेनं ‘सामना’मधून खरपूस समाचार घेतला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख ?
गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं?
राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते भगतसिंग कोश्यारी यांनी दाखवून दिले आहे. श्रीमान कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजपचे नेते असतीलही; पण आज ते महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचे राज्यपाल आहेत याचा त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतोय. महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात हे समजण्यासारखे आहे; पण त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा? भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या दुखणाऱया पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही.
हे दुखणं किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर आहे. पण त्या बाळंतकळांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपचार केले आहेत. राज्यपाल पदावरील बुजुर्ग व्यक्तीने आपल्या मर्यादा सोडून वागले तर काय होते, त्याचा धडा देशातील सर्वच राज्यपालांनी घेतला असेल. राज्यात मंदिरे उघडा यासाठी भाजपने आंदोलन सुरू केले. त्या राजकीय आंदेलनात राज्यपालांनी सहभागी व्हायचे तसे कारण नव्हते. हे आंदोलन सुरू असल्याचे टायमिंग साधत माननीय राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. ते पत्र मुख्यमंत्र्यांच्या हाती पोहोचण्याच्या प्रवासातच वृत्तपत्रांकडे पोहोचले.