मुंबई – शिवसेना आमदारांनी बाजूला निघून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन गट केला आणि भाजपने त्याला पाठींबा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. यानंतर ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाचा दाखला देत खासदार संजय राऊत यांनी नव्या सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलय.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराबाबतची एक महत्वाची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे यांनी संजय राऊत यांच्याबाबत भाष्य केलं. पत्रकारांनी राऊतांच्या टीकेबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा, आता त्यांच्यावर मला बोलण्याची आवश्यकता नाही. कारण रोज सकाळी उठून तेच काम असतं त्यांना. मला तेवढंच काम नाहीये”, असं स्पष्ट मत शिंदेनी यावेळी व्यक्त केलं.
काय म्हणाले होते संजय राऊत
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एक दुजे के लिए आहेत. हा नवीन सिनेमा महाराष्ट्रात सुरु झाला आहे. या सिनेमाचा शेवट काय झाला होता हे आपण पाहिले असेल. सध्या सुरु असलेल्या सिनेमाचा राजकीय अंतसुद्धा त्याच पद्धतीने होईल. ही राजकीय आत्महत्याच आहे, अशी टीका राऊत यांनी नव्या सरकारवर केली होती.