मुंबई – ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री, करोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं कारण काय आहे?, असे सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला विचारले आहे.
संदीप देशपांडे म्हणाले कि, काही दिवसांपूर्वी उद्योगपतींना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी कशी दिली? त्यांच्यावर काय कारवाई झाली, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, या संपूर्ण वर्षात लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी करोनाची भीती दाखवत आहात, तर अमेरिकेसारखे पॅकेज द्या, अशी मागणीही देशपांडेंनी केली आहे.
करोनाची फक्त भीती दाखवू नका. तुमची ती नाईट लाईफ, लोकांना फक्त करोना, असे आहे का? असा टोलाही देशपांडेंनी लगावला आहे.
तुमची night life ती night life आणि जनतेची पार्टी करो ना!! pic.twitter.com/nP0ZzzzphW
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 23, 2020
दरम्यान, ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी केली जाणार आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत ही संचारबंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.