मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल युतीच्या बाजूने आला असला तरी अद्याप सत्तास्थापण करण्यात सेना आणि भाजपने पुढाकार घेतला नाही. दरम्यान, आता आज कोणताही निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देवू शकतात. तसेच आज संध्याकाळपर्यंत सर्व मंत्री सरकारी गाड्या आणि इतर सुविधा देखील सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत त्याच शिवसेना आणि भाजप यांच्यातील संवाद पुर्णत: बंद आहे त्यामुळे राज्यात सत्तास्थापणेचा तिढा कायम राहणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, 13 वी विधानसभा ही 10 नोव्हेंबर 2014 रोजी अस्तित्वात आली होती. त्यामुळे उद्या म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ पुर्ण होणार आहे.
घटनात्मक तरतूदीनुसार त्यापुर्वी राज्यात नवे सरकार स्थापण करणे गरजेचे आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत जर राज्यात सरकार स्थापण झाले नाही तर घटनात्मक पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे एक तांत्रिक बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता आहे.