कोल्हार खुर्द -करोना विषाणू चे संक्रमण देशात पसरले आहे, हे संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन केल्याची घोषणा केली. त्यामुळे रिझर्व बॅंकेने सध्या सुरू असलेल्या परिस्थितीमुळे सर्व बॅंका, मायक्रोफायनान्स, बचत गट, सहकारी बॅंका, पतसंस्था यांना कर्जदारांची सर्व प्रकारची कर्जवसुली, कर्जाचे हप्ते बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे, मात्र तरीही मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कर्जदारांच्या बॅंक खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी आपली कर्जवसुली केली आहे, त्यामुळे येथील काही कर्जदारांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवर या फायनान्स कंपन्यांच्या विरोधात तक्रार दखल केली आहे.
लॉकडाऊनमुळे छोट्या व्यवसायिकांसमोर व्यवसाय चालवणे जिकरीचे झाले आहे. अनेक व्यवसायिकांनी व्यवसायासाठी खाजगी पतसंस्था, सरकारी बॅंका, बचत गट, मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्जे घेऊन आपापले व्यवसाय सुरू केले होते. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय ठप्प झाले आहेत, त्यामुळे आवक घटली असून दुकानदारी करणे जिकरीचे झाले आहे.
भारतीय रिजर्व बॅंकेने महत्वपूर्ण घोषणा करत कर्जदारांकडून कर्ज वसुल न करण्याचे आदेश दिले, त्यामुळे व्यावसायिक आणि कर्जधारकांना मोठा दिलासा मिळाला.
मात्र एप्रिल महिना सुरू झाला, आणि मायक्रोफायनांस कंपन्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कर्जदारांच्या बॅंक खात्यात असलेल्या रकमेपैकी आपला हप्ता वसुल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्जदारांकडून या मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या या मनमानी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रिझर्व बॅंकेने केलेल्या सूचनांचे पालन हे मायक्रोफायनांस कंपन्यांनी काटेकोरपणे करायला हवे. या सर्व खासगी फायनांस कंपन्या रिझर्व बॅंकेच्या कक्षेत राहून काम करत आहेत, त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ठोस भूमिका घेणे महत्वाचे आहे. मात्र केंद्र सरकारकडून या संदर्भातील भूमिका स्पष्ट होत नसल्याचनेच या कंपन्या निर्ढावल्या आहेत. तरी या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी ृचर्चा करणार आहोत.
लहू कानडेआमदार