पुणे – कोकणासह मध्य महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात बरसल्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या पाच ते सहा दिवस राज्यात तुरळक सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने पुण्यासह बहुतांश भागांत 17 ते 19 मे याकालावधीत मध्यम ते मुसळधार, तर घाटमाथा आणि कोकणात मुसळधार पाऊस झाला. मात्र, पुढील काही दिवस विदर्भातील काही भाग वगळता अन्य ठिकाणी पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
तसेच देशात मान्सूनची वाटचाल अजूनही मंदावली असून, मान्सूनची उत्तरसीमा सध्या बाडमेर, भिलवाडा, धोलपूर, अलिगढ, मेरठ, अंबाला आणि अमृतसर या भागांतून जात आहे. दरम्यान, पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमान खालावले होते. मात्र, सोमवारी तापमान हे सरासरीएवढे आहे.
धरणक्षेत्रांत किरकोळ पाऊस
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या क्षेत्रांत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 7.87 टीएमसी म्हणजे 27 टक्के इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रकल्पात दोन टीएमसी जादा पाणीसाठा उपलब्ध आहे.
सोमवारी दिवसभरात खडकवासला धरणात 0, पानशेत-1, वरसगाव-2 आणि टेमघरमध्ये 10 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर दि.1 जूनपासून आजपर्यंत सर्वाधिक पाऊस हा टेमघर धरण-465, पानशेत-324, वरसगाव-318 आणि खडकवासला क्षेत्रात 200 मिमी इतका पाऊस पडला आहे.