भवानीनगर – सध्या वातावरणात बदल होत असल्याने द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी द्राक्षबागा टिकवण्यासाठी आर्थिक झळ सोसून औषध फवारणी करत आहे. त्यामुळे अवकाळीतून सावल्यानंतर आता ढगाळ हवामानाचा घाला बागांवर बसत आहे.
थंडीचे दिवस सुरू असताना देखील वातावरणामध्ये बदल होत आहे. त्यामुळे द्राक्ष बागांवर अळी, डावणीचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना द्राक्ष बागाटिकवण्यासाठी रोजच द्राक्षबागेवर औषधांची फवारणी करावी लागत आहे. अगोदरच शेतकरी सर्व बाजूने आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यात पुन्हा औषध फवारणीचे संकट पुन्हा घोंगावले आहे. दूषित वातावरणामुळे द्राक्ष बागेवर अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अगोदरच कर्जाच्या खाईत बुडालेला शेतकरी यातिरिक्त होणाऱ्या औषधांच्या खर्चामुळे अजूनही जास्त आर्थिक अडचणीत सापडला आहे. द्राक्ष बागा वाचवणे शेतकऱ्यांपुढे सध्यातरी मोठे आव्हान आहे.
लाखोंचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी
एकावेळी द्राक्षबागांवर औषधफवारणी करण्यासाठी एकरी तीन ते चार हजार रुपये खर्च येत आहे. त्यात इंदापूर आणि बारामती तालुक्यात सुमारे तीन हजार एकर द्राक्षबागा आहेत. अवकाळीचा फटका 40 टक्के बागांना बसला आहे. त्यातून वाचलेल्या बागांवर औषध फवारणीसाठी लाखों रुपयांचा खर्च येत आहे.