सातारा – या वर्षाच्या अखेरचे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची सातारकरांची इच्छा ढगाळ वातावरणामुळे पूर्ण झाली नाही. सकाळी 9 ते 11 या वेळेत झालेल्या सूर्यग्रहणाचा खगोलीय आविष्कार ढगांच्या आड लपल्याने सर्वांचा हिरमोड झाला.
या कंकणाकृती सूर्यग्रहणाची सातारकरांना, विशेषतः युवा वर्गाला उत्सुकता होती. ग्रहण पाहण्यासाठी थ्रीडी गॉगलची व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने साताऱ्यात दुपारी तीन वाजेपर्यंत ढगाळ हवामान होते. त्यामुळे या वर्षातील अखेरच्या खगोलीय घटनेचा आनंद सातारकरांना घेता आला नाही.
ग्रहण काळात स्त्रियांनी, विशेषतः गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये, जलपान व इतर कामे न करता विश्रांती घ्यावी, अशा रूढी आहेत. मात्र, सूर्यग्रहणाबाबत असलेले गैरसमज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी खोडून काढले. ते म्हणाले, सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना आहे. या घटनेचा स्त्रियांच्या आरोग्याशी संबंध नाही.
ग्रहणाबाबत अनेक गैरसमज आहेत. विज्ञान युगातही त्यांचा प्रभाव कमी झालेला दिसत नाही. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने म्हणाले, ग्रहणाचा गर्भवती महिलांवर प्रतिकूल परिणाम होतो, हा गैरसमज आहे. ग्रहिण व गर्भवती महिलांची प्रसूती यांचा संबंध नाही.