पॉलिसी धारकांच्या हितासाठी “एलआयसी’चा पुढाकार
2 वर्षांपासून प्रीमियम न भरल्यामुळे लॅप्स झालेल्या पॉलिसीधारकांना दिलासा
पुणे – सध्याच्या नियमानुसार प्रीमियम 2 वर्षांपासून न भरल्यास विमा पॉलिसी लॅप्स होते. मात्र, भारतीय जीवन विमा महामंडळाने म्हणजे “एलआयसी’ने अशा 2 वर्षांपासून प्रीमियम न भरल्यामुळे लॅप्स झालेल्या पॉलिसीधारकांना संबंधित पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची मुभा दिली आहे.
भारतीय जीवन विमा नियामक अधिकारी म्हणजे “आयआरडीए’चा उत्पादन नियमन नियम 1 जानेवारी 2014 पासून अंमलात आला आहे. या नियमानुसार 2 वर्षांपासून प्रीमियम न भरल्यास पॉलिसी लॅप्स होते. त्यानंतर बऱ्याच पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर “एलआयसी’ने ही कालमर्यादा वाढवून देण्याची विनंती “आयआरडीए’ला केली होती. या संबंधात परवानगी मिळाल्यानंतर “एलआयसी’ने 2 वर्षांनंतरही पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची मुभा आपल्या ग्राहकांना दिली आहे.
“एलआयसी’चे अध्यक्ष बिपीन आनंद म्हणाले, ज्या पॉलिसी धारकांनी 1 जानेवारी 2014 नंतर पॉलिसी घेतल्या आहेत. त्यांच्यापैकी नॉन लिंक विमा धारकांनी 5 वर्षांपर्यंत प्रीमियम न भरल्यास आणि युनिट लिंक विमा धारकांनी 3 वर्षांपर्यंत प्रीमियम न भरल्यासही त्यांना नंतर पॉलिसी सुरू करता येईल.
ते म्हणाले, अनेकदा परिस्थितीजन्य कारणांमुळे पॉलिसी धारकांना प्रीमियम भरता येत नाही. त्यामुळे नवी पॉलिसी काढावी लागते. आता आमच्या काही ग्राहकांना नवी पॉलिसी काढण्याऐवजी जुनी पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहे. आमचे पॉलिसीधारक आमच्यासोबत रहावे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यामुळे किती लॅप्स झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू होतील, याबद्दल आताच काही सांगता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.