उशिरा पेरलेल्या गव्हासाठी चांगले; पण आरोग्य बिघडले
रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा झाले कमी
सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये झाली वाढ
अनिल देशपांडे
राहुरी – पहाटे थंडी, दिवसा बऱ्यापैकी कडक ऊन असे विचित्र हवामान सध्या परिसरात आहे. रात्रीचे अर्थातच किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने थंडीचा अनुभव येत आहे. तर दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने मार्चचा पूर्वार्धातील सप्ताह सुसह्य ठरतो आहे. दरम्यान, हवामानातील बदलामुळे उशीरा पेरणी केलेल्या गव्हासाठी हे वातावरण चांगले झाले तर आरोग्याच्या दृष्टीने हानीकारण झाले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप हे आजार वाढले आहेत.
संक्रांतीनंतर थंडी कमी असा अनुभव येत नाही. बदलत्या हवामानाचा हा परिणाम असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी हवामान विभागाचे डॉ.रवी आंधळे यांनी मत नोंदविले. रात्रीच्या चांगल्या थंडीच्या तूलनेत सरासरीपेक्षा कमी असणारे दिवसाचे कमाल तापमान ही अधिक ऊकाड्याचे वाटते आहे हे खरे आहे. मात्र या सप्ताहात दिवसाचे कमाल तापमान कमी नोंदवले गेले आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या सप्ताहात राज्यातील काही भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्याचा परिणाम राहुरी व परिसरातील वातावरणार व हवामानावर झाला आहे.
पहिल्या सप्ताहात कमाल तापमान सरासरी 33.1 ते 33.9 अंश सेल्सिअस असे आहे. मात्र प्रत्यक्षात या सरासरीपेक्षा दिवसाचे तापमान कमी नोंदवले गेले आहे. दिवसा कडक ऊन पडते आहे. आकाश निरभ्र आहे. त्यामुळे एकदम उन्हाळा सुरू झाला की काय असे वाटते आहे, मात्र सरासरी तापमानापेक्षा दिवसाचे तापमान कमीच आहे. त्यामुळे तुलनेत मार्चचा पहिला सप्ताह सुसह्य ठरतो आहे. संक्रांतीनंतर थंडी तिळातिळाने कमी होत जाते, असा सार्वत्रिक अनुभव असला तरी यंदाचा फेब्रुवारी व मार्चचा पूर्वार्ध याला अपवाद ठरताना आहे. रात्रीचे अर्थातच किमान तापमान या सप्ताहात 12.9 ते 18.9 अंश सेल्सियसच्या दरम्यान नोंदवले गेले.
या सप्ताहातील सरासरी किमान तापमान 12.8 ते 13.6 अंश सेल्सिअस आहे. सरासरी पेक्षा रात्रीचे तापमान कमी असल्याने रात्री ,पहाटे कडाक्याची थंडी असा अनुभव नागरिकांना येत आहे. पुढील आठवड्यात परिसरातील आकाश निरभ्र राहील व दिवसाच्या तापमान 31 ते 34 अंश सेल्सिअस राहील तर रात्रीचे किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. या सप्ताहात महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोंदलेले कमाल व किमान तापमान अंश सेल्सियस मध्ये.
रात्री थंडी पडत असल्याने उशीरा पेरणी केलेल्या गव्हासाठी चांगले वातावरण झाले आहे. मात्र पिकांवरील रोग, किर्डीचा प्रादुर्भाव वाढ शकतो.
डॉ. दत्तात्रय वने ,कृषीभूषण शेतकरी
दिवसा कडक ऊन व रात्री थंडी, गार वारा यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, खोकला, तसेच दम्याच्या रुग्णांचा त्रास वाढला आहे.
डॉ. अशोक कुसळकर, राहुरी