राज्य सरकारकडून निवड प्रक्रियेचे आदेश
पुणे – राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदांच्या रिक्त जागांची निवड प्रक्रिया राबविण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याने पुणे जिल्ह्यातील 1400 सरपंचांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दि. 17 मार्चला या पदांच्या निवडीला स्थगित दिली होती. राज्यात अनेक ग्रामपंचायतींनी सरपंच आणि उपसरपंच यांचे राजीनामे घेऊन नवीन निवडीबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. आता राज्य सरकारने ग्रामपंचायतींच्या बैठका घेऊन निवड प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 1400 सरपंचांची निवड प्रक्रिया होऊ शकणार आहे.
जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 27 मार्चला काढण्यात येणार होती. ही प्रक्रिया राबवून आता जिल्ह्यातील सरपंच पदांच्या निवडी होणार आहेत. सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 750 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आणि सहा ग्रामपंचायतींसाठी मार्चअखेरीस होणारी निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यापूर्वी दिले होते. आता राज्य सरकारच्या निर्णयानुसार सरपंच पदांच्या निवडीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बारामती तालुक्यातील मुर्टी, मोराळवाडी, खराडेवाडी, पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी आणि भिवरी, दौंड तालुक्यातील बिरोवावाडी अशा सहा ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये संपणार आहे. या निवडणुकांसाठी 29 मार्चला मतदान, 30 मार्चला मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम प्रशासनाने आखला होता.