अलाहाबाद: अयोध्येमध्ये 5 ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिर भूमिपूजनाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका साकेत गोखले यांनी दाखल केली होती.
या याचिकेवर मुख्य न्यायाधिश गोविंद माथुर आणि न्या. एस. डी. सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या याचिकेत साकेत गोखले यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनलॉक-2 च्या नियमांचे उल्लंघन असल्याचे नमूद केले होते. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी तीनशे लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे करोनाचा संसर्ग होण्याचा अधिक धोका असल्याचे सांगितले.
ही याचिका गृहितकांवर आधारित असून यात नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी कोणताही पाया नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण सापडत नसल्याचे नमूद करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.