पुणे- छत्रपती संभाजी महाराज पुलावरून मेट्रोचा पूल प्रस्तावित आहे. यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीस अडथळा येईल, अशी बाजू मांडत मनपा मुख्यभेतही गदारोळ झाला. पण, दुसऱ्या बाजूला शहरातील मानाच्या आणि सर्व प्रमुख मंडळांनी “मेट्रोच्या या पुलाला विरोध नाही,’ अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “पुण्याच्या विकासासाठी आमची भूमिका सदैव सकारात्मक राहिली आहे,’ असे या मंडळांनी म्हटले आहे.
“छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोची एक मार्गिका गणपती विसर्जन मार्गावरून जात आहे. ज्यावेळी हे काम सुरू झाले, त्यावेळी कोणाच्याही लक्षात आले नाही किंवा कोणी निदर्शनास आणून दिले नाही. या पुलाच्या उंचीमुळे गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणूक रथास अडथळा निर्माण होणार आहे. त्यावर हे काम बंद करण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देण्यात आले. त्यावर महापौरांनी सातत्याने बैठक घेऊन त्याबाबत काही मार्ग निघतोय का, यासाठी जवळपास चार महिने प्रयत्न केले. परंतु, व्यवहार्य मार्ग न निघाल्याने महापौरांनी काम सुरू करण्यास सांगितले. आम्ही गणपती मंडळ कार्यकर्ते असलो, तरी जबाबदार पुणेकर नागरिक आहोत. पुण्याला वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा असून समाज प्रबोधन, समाजहिताला प्राधान्य दिले आहे. मेट्रो पुलाच्या उंचीबाबत आमचा कधीही विरोध नव्हता. पुण्याच्या विकासासाठी मेट्रोच्या पुलास आम्ही कोणताही विरोध करत नाही,’ अशी भूमिका मंडळांनी मांडली आहे.
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, श्री केसरी वाडा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनित बालन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.