कराड -कराड शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातील सेटलिंक टॅंकमध्ये साचलेला गाळ मंगळवारी काढण्यात आला. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टाकीची स्वच्छता केली.
दरवर्षी पावसाळ्याच्या प्रारंभापूर्वी पालिकेतर्फे या टॅंकची स्वच्छता करून गाळ काढण्यात येतो. मंगळवारी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या सूचनेनुसार या टॅंकची स्वच्छता करण्यात आली.
पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या 20 कर्मचाऱ्यांनी आज टॅंकच्या स्वच्छतेचे काम केले.
जलअभियंता विजय तेवरे, आरोग्य विभागाचे मिलिंद शिंदे, संजय पवार, खाडे आदी अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन जल शुध्दीकरण केंद्रातील सेटलिंक टॅन्कमध्ये दरवर्षी गाळ साचतो. हा गाळ पावसाळ्यापूर्वी काढून घेतला जातो. पावसाळ्यात नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा होण्यासाठी याची स्वच्छता केली जाते.
शहरातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी पालिकेकडून नेहमीच काळजी घेतली जाते. मंगळवारी शहरात सकाळी एकवेळ पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सेंटलिंक टॅंकची स्वच्छता करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शहरात पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती जलअभियंता तेवरे यांनी दिली.