पं. हरिप्रसाद चौरसिया : “षड्ज’ शास्त्रीय संगीतावरील लघुपट महोत्सव
पुणे -शास्त्रीय संगीत हे सर्वांना निश्चितपणे आवडू शकते. मात्र, कोणत्या श्रोतेगटासमोर काय गावे अथवा वाजवावे याचा अभ्यास कलाकाराने करणे आवश्यक आहे. तरच वेगवेगळ्या प्रकारच्या रसिकांपर्यंत हे संगीत पोहोचवता येईल, असे मत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केले.
“सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या “षड्ज’ या शास्त्रीय संगीतावरील लघुपट महोत्सवास तसेच “अंतरंग’ या संवादात्मक कार्यक्रमास बुधवारी सुरुवात झाली.
सवाई गंधर्व स्मारक येथे चार दिवस चालणाऱ्या या खुल्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रख्यात गायक अमरेंद्र धनेश्वर यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया यांची मुलाखत घेतली. यावेळी “षड्ज’ अंतर्गत दिग्दर्शक व्ही. पाकिरीसामी यांचा “पंडित रामनारायण अ ट्रिस्ट विथ सारंगी’ व एस. एन. शास्त्री दिग्दर्शित उस्ताद “अमीर खॉं’ हे लघुपट दाखविण्यात आले.
पं. चौरसिया म्हणाले, “माझ्या वादनाची श्रोत्यांकडून तारीफ होत असली तरी मी स्वतःला यशस्वी मानत नाही. सतत प्रयत्न करत राहणे आणि शिकत राहणे मला महत्त्वाचे वाटते. बासरी हे महिलांनी वाजविण्याचे वाद्य नाही, असा एक मतप्रवाह आहे. मात्र, माझ्या अनेक महिला शिष्या असून त्या उत्तम बासरी वाजवतात. हे वाद्य शिकण्यात कोणताही लिंगभेद नाही. माझ्या सर्व शिष्यांना मी मित्र किंवा माझ्या परिवाराचे सदस्यच समजतो.
मंत्र्यांच्या घरातही बासरी वाजवा..
बासरी हे वाद्य योगप्रमाणे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते आणि त्याबरोबरच आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न ठेवते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या घरात बासरी वाजायलाच हवी, पण खास करून प्रत्येक राजकारण्याच्या आणि मंत्र्यांच्या घरात वाजायला हवी. म्हणजे भांडण-तंटे दूर राहतील आणि हार्मनी निर्माण होईल, अशी मिश्किल टिप्पणी पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी केली.
सवाई गंधर्व महोत्सवास प्रारंभ
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान या ठिकाणी असलेल्या सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुधवारी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला औपचारिक सुरुवात झाली. गेली सहा दशके ही प्रथा सुरू असून दरवर्षी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त, कार्यकर्ते आणि संगीतप्रेमी या ठिकाणी जमतात आणि सवाई गंधर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करीत असतात. 1960च्या दशकात आचार्य अत्रे व तत्कालीन महापौर नाना गोरे यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. तेव्हापासून महोत्सव सुरू होण्याच्या दिवशी सकाळी या पुतळ्याला हार अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली, अशी आठवण आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितली.