पुणे – राज्यातील शाळांना इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या 27 जानेवारीपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सोमवारी प्रसिद्ध झाला. केंद्र व राज्य शासनाने करोना पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांचे पालन करीत सुरक्षितपणे वर्ग सुरू करण्याचे आव्हान शाळांपुढे उभे राहिले आहे. त्यातच मुलांची उपस्थिती किती असेल, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. सध्या करोना प्रादुर्भाव कमी होत असून, इयत्ता नववी व बारावीच्या वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे.
त्यामुळे शाळांमध्ये करोना प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि त्याचा मानसिक परिणाम विद्यार्थी व पालकांमध्ये होऊ नये, या धारणेतून शाळा सुरू करणे विद्यार्थ्यांसाठी हितावर राहील. त्याचा विचार करून राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षकांची करोना चाचणी अनिवार्य
प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना करोनाची चाचणी करून घेणे आणि त्याचा अहवाल शाळा प्रशासनास सादर करण्याची अट आहे. त्यामुळे या शाळा सुरू होण्यास आणखी आठवडाभराचा कालावधी आहे. त्यादरम्यान सर्व शिक्षकांना करोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. मात्र, शिक्षकांची संख्या पाहता शाळा सुरू होण्यापूर्वी चाचणीची प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे शाळांचे सर्व वर्ग एकाचवेळी सुरू होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.
पालकांची संमतीपत्र आवश्यक
शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांना मुलास शाळा पाठविण्यासाठी समंतीपत्र लिहून देणे आवश्यक आहे. तरच शाळांना वर्ग सुरू करता येणार आहे. सद्य:स्थितीत करोनाचा संसर्ग कमी होत आहे. त्यातच शालेय विद्यार्थ्यांना करोना लस दिले जाणार नसल्याचे यापूर्वीच आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लस प्रत्यक्षात येईपर्यंत मुलांना शाळेत सोडण्याचा हट्ट पालकांना सोडावा लागणार आहे. त्यामुळे किती पालकांचा प्रतिसाद मिळतो, हेच आता पाहावे लागणार आहे.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या
शाळांची एकूण संख्या : 1 लाख 6 हजार 491
एकूण शाळा व विद्यार्थ्यांची संख्या
वर्ग – विद्यार्थी संख्या
पाचवी – 19,98,966
सहावी – 19,74,024
सातवी – 19,50,828
आठवी – 19,23,182
एकूण : 78,47,000