पुणे – इयत्ता अकरावीसाठी तीन दिवसांत केवळ 15 हजार 101 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. गुणवत्ता यादीत स्थान मिळालेले असतानाही प्रवेशासाठी सोयीचे नामांकित महाविद्यालय मिळाले नसल्याने विद्यार्थी प्रवेशाकडे पाठ फिरवत आहेत.
अकरावी ऑनलाइन प्रवेश फेरीची रविवारी गुणवत्ता यादी जाहीर झाली. यासाठी 73 हजार 685 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यातील 68 हजार 72 अर्ज पात्र ठरवले आहेत. गुणवत्ता यादीत एकूण 40 हजार 13 विद्यार्थ्यांना संधी मिळाली. यातही प्रथम पसंतीक्रमांक मिळालेल्या 19 हजार 575 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 28 हजार 59 विद्यार्थ्यांना यादी स्थान मिळालेच नाही.
गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चितसाठी 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वा.पर्यंत मुदत आहे. आतापर्यंत 21 हजार 113 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संमती दर्शविली. त्यातील सर्वच विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश नोंदविलेले नाहीत.
18 हजार 900 विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबत काही माहितीच नोंदविलेली नाही. दरम्यान, दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होणार आहे, अशी माहिती प्रवेश नियंत्रण समिती सचिव मीना शेंडकर यांनी दिली.