पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीआयएससीई बोर्डानेही इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.
त्यानंतर आयसीएसई बोर्ड परीक्षेबाबत काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे लक्ष लागले होते. त्यावर सीआयएससीई बोर्डाचे सचिव गेरी अर्थोन यांनी परीक्षा लांबणीवर टाकल्याचे परिपत्रक जारी केले आहे.
आयसीएसई म्हणजेच दहावी व आयएससीच्या म्हणजेच बारावीच्या परीक्षा 4 मे पासून सुरु होणार होत्या. मात्र आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पर्याय देण्यात येणार आहे. ऑफलाईन परीक्षा देणे अथवा ऑफलाईन परीक्षा न देणे असे दोन पर्याय देण्यात येणार आहेत. ऑफलाईन परीक्षा न देण्याचा देण्याचा पर्याय निवडल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याबाबत ठराविक निकष निश्चित करण्यात येणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.