कोल्हापूर- संसदेत पास केलेले शेतकरी कृषी विधेयके मागे घ्या या मागणीसाठी पुणे बेंगलोर हायवे वरती हातकणंगले तालुक्यातील शेतकरी संघटनांनी पंचगंगा पुलावर रास्तारोको केला. शेतकरी कार्यकर्त्यांनी रास्तारोको करतांनाच पोलीस व शेतकरी यांच्यात झटापट आणि धक्काबुक्की झाली. गिरीश फोंडे व रवि जाधव यांना पोलिसांनी जबरदस्ती उचलून पोलीस गाडीत ढकलले. प्रचंड घोषणाबाजी व धक्काबुक्की करत पोलीस आणि प्रमुख नेत्यांना अटक केली व पोलीस स्टेशन मध्ये नेऊन सोडून दिले.
रास्तारोको करण्यापूर्वी विविध नेत्यांनी भाषणे केली. यावेळी बोलताना आंदोलनाचे संघटक भाकप जिल्हा सहसेक्रेटरी गिरीश फोंडे म्हणाले,” संसदेत पास केलेली कृषी विधेयके ही शेतकरीविरोधी व जनता विरोधी देखील आहेत. बाजार समित्या बरखास्त करुन अदानी अंबानीला कमी किमतीत शेतीमाल ताब्यात घ्यायचं व शेतीचं कार्पोरेटकरण, कंत्राटी शेतीच्या माध्यमातून होणार आहे. शेतीमाल हमीभावाचा कायदा करणे गरजेचे असताना सरकारने या कृषी विधेयकातील उलटी पावले टाकली आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते वैभव कांबळे म्हणाले,” मोदी सरकार केवळ भांडवलदारांची हस्तक आहे. नव्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजून वाढतील. स्वामीनाथन आयोगाचे ंमलबजावणी करण्याचे बीजेपी ने जाहीरनाम्यात मान्य केले होते पण निवडून आल्यावर शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शे.का.प.चे प्राचार्य टी. एस. पाटील म्हणाले,” बीजेपी सरकार म्हणजे शेटजी भटजीचे सरकार आहे. या देशातल्या शेतकरी बळीराजा चे शोषण हे बीजेपीचा तत्वज्ञानाचा भाग आहे.
यावेळी जनता दलाचे नेते रवी जाधव, भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, समाजवादी पार्टीचे हसन देसाई, राष्ट्रवादी पक्षाचे व्यंकाप्पा भोसले आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांची भाषणे झाली. शिरोली एमआयडीसी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व गांधीनगर पोलीस निरीक्षक भांदवलकर, तसेच सुशांत चव्हाण यांच्या निगराणीखाली सकाळपासूनच प्रचंड पोलिस बंदोबस्त होता.
“शेती बचाव देश बचाव, नवीन कृषी विधेयके हाणून पाडा, शेतकरी विरोधी मोदी सरकारचा धिक्कार असो, शेतीचे खाजगीकरण होऊ देणार नाही, सहकार बचाव देश बचाव, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो” कार्यकर्त्यांनी अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी संजय चौगुले, बाबुराव कदम, संपत पोवार, संभाजी जगदाळे, प्रशांत आंबी, महेश पांडव,अमोल चंद्रकांत होनकांबळे, राजेंद्र पाटील, सुनंदा शिंदे, राजू देसाई, निखिल चव्हाण, हरीश कांबळे, अण्णा मगदूम,प्रदीप फोंडे, दिलदार मुजावर, बंडू पाटील, अरुण शेंडगे, आरती रेडेकर, कुमार जाधव, मासाई पखाले यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर) अ.भा.किसान सभा, आम आदमी पार्टी, यासह विविध संघटना सहभागी झाल्या.