संतोष पवार
सातारा – राज्यातील सत्तांतरानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असून जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्ये ठिकठिकाणी जोरदार सत्तासंघर्ष होणार आहे. कॉंग्रेस, उध्दव ठाकरेंची शिवसेना व बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची रंगीत तालीम सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकीमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. दि. 28 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून दि. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने गावागावात इच्छुकांची संख्या जास्त आहे.
जावळी तालुका 15, कराड 44, खंडाळा 2, खटाव 15, कोरेगाव 51, महाबळेश्वर 6, माण 30, पाटण 86, फलटण 24, सातारा 39, वाई तालुका 7 अशा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. गावोगावी वातावरण तापू लागले आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ग्रामीण भागातही पक्षीय फुटाफुटी दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप व शिवसेना शिंदे गटाने व्यूहरचना आखली आहे.
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदन भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्यासह माजी आमदार, पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह देण्याचा निर्धार केला आहे. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. महेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर सत्ता खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जिल्ह्यात काही अंशी गळती लागली असली तरी नितीन बानुगडे पाटील, शेखर गोरे यांनी शिवसैनिकांची मोट बांधली आहे. या निवडणुकीत त्यांच्याकडूनही पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात मजबुत स्थितीत असून खा. श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, प्रभाकर देशमुख, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, बाळासाहेब सोळस्कर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उदय कबुले यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गावोगावी पक्षांतर्गत गटबाजी होऊ नये यासाठी पक्षाकडून प्रयत्न होत आहेत.
जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, रणजितसिंह देशमुख यांच्यासह कॉंग्रेसचे माजी आमदार, पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेसला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
भाजप व राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जिल्हा ओळखला जातो. अडीच वर्षाच्या सत्ता काळात अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासकामाचा डोंगर उभा करुन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणखी मजबूत झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भाजप आपली ताकद दाखवून जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष होईल असे बोलले जात आहे. दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींनी आपापल्या परीने निवडणुकीच्या रिंगणात मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार की भाजप बाजी मारणार हे मतमोजणीनंतरच कळणार आहे.