आठव्या वंशजांची भारताशी हातमिळवणी
लंडन: हैदराबादच्या निझामाच्या 3 अब्ज 8 कोटी 58 लाख 97 हजार 500 रुपयांच्या (35 दशलक्ष पौंड) संपत्तीवरून भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरू आहे. हा वाद आता अंतिम टप्यात आला असून निझामाचे वंशज राजकुमार मुक्कम्मर जाह आणि त्यांचे लहान बंधू मुफक्कम जहा यांनी भारत सरकार सोबत हातमिळवणी करत या संपत्तीसाठी भारत हक्कदार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या संपत्तीवरुन भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या या वादावर लवकरच पडदा पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
1947 साली जेंव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले, त्यावेळी तत्कालिन निझाम ओस्मान अली खान यांनी लंडन येथील नॅट वेस्ट बॅंकेत 10 लाख 7 हजार 940 पौंड ठेवले होते. या पैशावरुन त्यावेळेपासून वाद सुरू झाला होता. या वादामुळे गेली अनेक वर्षे हे पैसे बॅंकेत पडून राहिले. ते आता तब्बल 35 दशलक्ष पौंड झाले आहेत.
दरम्यान 1948 साली तत्कालिन निझामाने हे पैसे नवनिर्मित पाकिस्तानसाठी पाठवल्याचा दावा पाकिस्तानचे लंडनस्थित तत्कालिन गव्हर्नरांनी केला होता. भारताला हे पैसे देवू नये यासाठी गेल्या 70 वर्षांपुर्वी दावा दाखल केला होता. या संदर्भातील सुरू असलेल्या दाव्यामध्ये दोन अठवड्यांपेक्षा जास्त काळ सुनावणी झाल्यानंतर निझामाचे आठव्या वंशजांनी
पूर्वजांनी ठेवलेले पैसे परत मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. या संदर्भातील निकाल 6 आठवड्यांमध्ये लागणे अपेक्षित आहे.