एक मुलगी कोणाशी तरी फोनवर बोलत असताना काही वाक्ये कानावर पडली, त्यावरून अंदाज आला की ती तिच्या प्राध्यापकाशी बोलत आहे; पण बोलताना ती त्यांचा उल्लेख एकेरी करत होती. मला हे थोडेसे वावगे वाटले. तिचे संभाषण संपताच मी अधिकारवाणीने तिला असे संबोधण्यामागचे कारण विचारले, त्यावर ती म्हणाली, अशाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे संबंध मैत्रीपूर्ण राहतात. मी थोडा चमकलो. कारण प्रत्येक नात्याचा आपला एक मान, एक महत्त्व, एक आदर असावा अशी आपली संस्कृती शिकवते.
त्यांच्या या संभाषणावरून एक गोष्ट आठवली. ती अशी की, एका गुरूकुलामध्ये शिष्य होळी खेळत होते. त्यांचे एकमेकांना रंग फासणे सुरू असताना तिथे गुरूंचे आगमन झाले, गुरूंना अचानक आलेले पाहून सारेच चपापले, गुरूंनी शिष्यांच्या मनातले भाव ओळखले व वातावरणात सहजता यावी म्हणून ते स्वतः विचारते झाले, “अरे! माझ्याशी होळी खेळणार नाही का?’ यावर एक शिष्य पुढे सरसावला, त्याने मुठीत रंग घेतले आणि गुरूंच्या नजिक जात गुलालाने भरलेली आपली मूठ त्यांच्या चरणावर रिक्त केली. गुरूंबरोबर होळीही खेळणे झाले आणि त्यांचा पुरेपूर मानही राखला गेला. शिष्याची ही कृती आपल्या संस्कृतीत ज्येष्ठांबद्दल कसा “आदर’ बाळगला जातो याची वानगी देणारा ठरावा.
इथं एक गोष्ट आणखी जोडाविशी वाटते की, एक राजा आपल्याकडे पाहुणा म्हणून आलेल्या राजा समवेत नगर भ्रमणाला निघाला. भ्रमण करताना एक याचक, राजा समोर आला. लगबगीने त्या याचकाने राजा समोर मान झुकवून कंबरेपासून वाकत राजास नमस्कार केला. राजानेही प्रतिसादा दाखल हलकेच आपली मान तुकविली. पाहुण्या राजाला यजमान राजाचे असे वागणे चमत्कारिक वाटले. न राहवता त्याने राजाशी असे करण्या मागे काय हशील असे विचारले? शेवटी याचकच तो! यावर राजा म्हणाला, एक याचक जर समोरच्याचा सन्मान ठेवण्याची “सभ्यता’ पाळत असेल तर मग राजा म्हणून प्रतिसाद देणे हे माझे धर्मच होऊन जाते… सभ्यतेचे याहून चांगले उदाहरण ते कोणते?
सौजन्याचे बोलायचे झाले तर… आठवते, की पूर्वी नवी साडी घेतली की बायका कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या. एक प्रेमळ रिवाजच होता तो! तेव्हा वर्षाला एखाद दुसरी साडीपर्यंतच मध्यमवर्गीयांची मजल असायची. त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत. पण तरीही आपली नवीकोरी साडी, नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला दिली जाई. नात्यातील एखादी गरीब बाई पण घडी मोडायला चालायची. त्यानिमित्ताने तिच्या अंगाला नवं कोरं कापड लागायचं. साडी घेताना तिला अवघडलेलं वाटू नये म्हणून, तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात, असंही सांगितलं जायचं. अशा बोलल्याने गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद मिळत असे.
हे तिन्ही उदाहरण आपली सभ्यता, आदर, सौजन्य यांची सांस्कृतिक ओळख देतात. पण मागील काही काळात सभ्यपणा, आदर देण्याची वृत्ती, सौजन्यशीलपणा समाजजीवनातून काहीसा लोप पावत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. जगण्याचे सारे मार्ग मौजमजेकडे वळल्याने आपल्या संस्कृतीला जपणाऱ्या अशा वारशाकडे आपली डोळेझाक होत आहे. जगात “यशस्वी होणे’ जगण्याचे केवळ हेच मापदंड होऊन बसल्याने या गुणांची मोजदाद नामशेष होत आली आहे. खरं पाहता, शालेय शिक्षण हेच माणसाला सुसंस्कृत बनवते हा गैरसमज खोलवर झिरपल्याने मानवी गुणांची ही मूल्य रूजवायची राहून गेली. नात्यात मैत्रीपूर्ण संबंध असावे, पण याचा अतिरेक करत आपण नात्याची आब तर घालवत नाही ना? याचा विचार होणे आवश्यक आहे.
सौजन्याचा परिमळ माणसाला माणसाशी जोडण्यासाठी उपायोगी ठरतो. आपल्या वागण्यातील सभ्यता आपल्यातील संस्कारांचे परावर्तन करत असतात. आदर दिल्याने लोक आपलीशी होतात. आपली सौजन्याची वर्तणूक आपादकाळी आपल्या भोवती मदतीचे कडे उभे करते. पूर्वी पंगती पद्धतीमध्ये शेवटी असलेल्या व्यक्तीला शेवटची जिन्नस मिळत नाही तोवर पहिल्याने जेवण सुरू करू नये, असे संकेत पाळत सभ्यतेचे आदर्श ठेवले जाई.
सुबत्तेमुळे आपण आर्थिक उंची गाठली असली तरी अशा गुणांचा आसरा घेतल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. या बरोबरच नम्रता, दया, कृतज्ञता, परोपकार, औदार्य असे अनेक गुण पदरी बाळगणाऱ्याचे जगणे समृद्ध होत जाते. आपणही पिढी दर पिढी यांचा सांभाळ करत आलो आहोत. त्यामुळे नव्या जीवनशैलीतही याचे स्थान अबाधित असावे, यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे. ही आपलीच जबाबदारी.
सत्येंद्र राठी