सातारा – जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षारक्षकांचा गेल्या तीन महिन्यांपासून पगार झाला नसल्यामुळे सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन केले, त्यामुळे सिव्हिलच्या कामकाजावर परिणाम झाला.
सिव्हिलमध्ये सध्या 21 सुरक्षारक्षक आहेत. त्यामुध्ये पाच महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे. आठ तासांहून अधिक वेळ हे कर्मचारी सिव्हिलमध्ये आपली ड्युटी पार पाडत असतात. परंतु गेल्या चार वर्षांपासून पाच तारखेच्या आत त्यांना पगार कधीच मिळाला नाही. एवढेच नव्हे तर तीन ते चार महिने त्यांना पगाराविना रहावे लागत आहे. या सुरक्षारक्षकांना आठ हजार पगार आहे. अनेकांना स्वत:चे घरही नाही. त्यामुळे महिन्याला घरमालकाला भाडे द्यावे लागते. वेळेत भाडे दिले नाही तर घरमालक खोली खाली करायला सांगतात.
याशिवाय रोजचा घरगुती आणि मुलांचा शाळेचा खर्चही कसा करायचा, असा प्रश्न या सुरक्षारक्षकांसमोर वारंवार उभा राहत आहे. सिव्हिलमध्ये अनुदान जमा झाल्यानंतर सुरक्षारक्षकांचे पगार काढले जातात. मात्र नेहमी अनुदान जमा झाले नसल्याचे कारण पुढे करत त्यांचे पगार दिले जात नाहीत.
सध्या गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या हातात पगार नाही. त्यामुळे सर्व सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर काम बंद आंदोलन केले. परिणामी कामकाजावर परिणाम झाला. सिव्हिलमध्ये बऱ्याचदा तोडफोडीच्या घटना घडतात. त्यावेळी हेच सुरक्षारक्षक छातीची ढाल करुन पुढे उभे राहतात. आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पडतात. परंतु, त्यांच्याच संरक्षणासाठी कोणीही पुढे येत नाहीत, त्यामुळे सर्व सुरक्षारक्षक हतबल झाले आहेत. ट्रेझरी आणि सिव्हिलमधील प्रशासकीय कारभाराचा दर महिन्याला या सुरक्षारक्षकांना फटका बसत आहेत.