पुणे : नागरिकांना राहण्यासाठी उत्तम दर्जाची शहरे निर्माण व्हावीत, या दृष्टीने कोणत्या शहरांची राहण्यासाठी योग्यता अधिक आहे, याबाबत केंद्र सरकारकडून ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये पुणे अव्वल येण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी केले.
पुणे महापालिकेतील सर्व खातेप्रमुख यांची आढावा बैठक आयुक्तांनी घेतली. त्यावेळी त्यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांना आणि विभागप्रमुखांना सूचना केल्या. या सर्वेक्षणाविषयी डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी माहिती दिली. विविध विभागांचे वतीने करण्यात येत असलेल्या कामकाज संदर्भात आढावा घेण्यात आला.
यामध्ये अंदाजपत्रक तरतुदी, कायदेशीर बाजू, महसुलात वाढ करण्याचे मार्ग, जुन्या उपक्रमात अथवा योजनांमध्ये उपयुक्त बदल करणे, नागरिकांना अधिकाधिक हितावह होतील असे सकारात्मक बदल करणे, एखादी योजना नागरिकांचे हितावह नसेल तर त्यात बदल करणे अथवा बंद करून संयुक्तिक बदल करणे, खात्यातील माहिती, कायदेशीर बाबी अन्य खात्यांनी माहिती करून घेणे आणि आवश्यकतेनुसार जलद कामे, समन्वयासाठी उपयोग करणे, उपक्रमाची आवश्यकता, उपयुक्तता आहे का, उपक्रम राबवण्यापूर्वी अशा उपक्रमाचे दुबार कामे होतात का हे पाहिले पाहिजे, एकाच कामासाठी वारंवार खर्च होत आहे काय, कायदेशीर बाबी, धोरणात्मक बाबी, या सर्व बाबी विचारात घेऊन नियोजन करणे आवश्यक असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.
गोपनीय अहवाल कार्यवाही, परदेश दौरे, माहितीचा अधिकार, लाचलुचपत तक्रारी, अधिकार हस्तांतरण, लाड पागे समितीनुसार प्रस्ताव याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अनिल मुळे यांनी माहिती दिली.
मालमत्ता कर, पाणीपुरवठा, आकाशचिन्ह, क्रीडा, बांधकाम, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, पथ विभाग, उद्यान विभाग या विभागांचा आढावा, याशिवाय भटक्या कुत्र्यांबाबत उपाययोजना, भवनरचना विभागाकडील झालेले प्रकल्प, चालू स्थितीत आणि अंतिम टप्प्यात असलेले प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला.