सामाजिक कामाचा ध्यास असणाऱ्या महिलांनी 2019 साली एकत्र येत सिटी क्वीन्स नावाचे छोट रोपटं लावलं. यातून सामाजिक सेवा व महिलांच्या प्रश्न सोडवण्यास तळमळीने प्रयत्न सुरू करत महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार केले. ग्रुपमधील महिलांच्या समाजसेवेचा व्यापक दृष्टिकोन समोर येऊ लागल्याने यातून हळूहळू इतर महिला सामाऊ लागल्या. तीन वर्षात तब्बल 3 हजार महिला सिटी क्वीन्सच्या सदस्या झाल्या.
महिलांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी ग्रुपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात नामांकित डॉक्टरांच्या सुरेल गाण्यांच्या मैफिली सोबत महिलांना हळदी-कूंकु तसेच खेळ पैठणीचा हा मनोरंजनात्मक कार्याक्रम महिलांसाठी घेतले जातात. यंदा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधन ऊसतोड करणाऱ्या, वीट भट्टीवरील महिला कामगारांना साडी, संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. सिटी क्वीन्सच्या सभासदांसाठी 5 ट्रॅव्हल्स मधून मोफत पंढरपूर, गोंदवले व पुसेगाव सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या विचारातून साकारलेल्या खटाव तालुक्यातील “सह्याद्री देवराई’ प्रकल्पामध्ये सिटी क्वीन्स ग्रुपच्या महिलांनी वृक्षारोपण व साफ-सफाई केली. करोना काळात ग्रुपची संवेदनशीलता पहावयास मिळाली. समाजसेवेचा वसा घेतलेला हा ग्रुप भविष्यातही गोर-गरीब महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे ग्रुपच्या महिला सांगतात.
महिलांच्या सामाजिक कामातील जाणीवांमुळे गेल्या तीन वर्षात तीन हजारांहून अधिक महिला या ग्रुपकडे वळल्या आहेत. याचे सर्व श्रेय जाते जयश्री देशमुख, जयश्री चव्हाण, भारती पवार, शिल्पा पाटील, प्रमिला शिंदे, शकुंतला कणूंजे, अपर्णा फल्ले, रेखा राजगडकर, बबिता डिंगणे, सुनीता जठार, संध्या पाटील, अपर्णा तांबे, त्रिशला मल्लाडे, मानसी जगताप, वैष्णवी महाजन, शमा शिकलगार, पुष्पा चव्हाण, शारदा गुरव, क्षीतिजा बर्गे, गौरी जाधव या रणरागिनींना.