ऐन पावसात पालिकेची रस्त्यावरील खड्डे भरण्याची तयारी सुरू
सातारा – अनेक ठिकाणी महापुराने दैना केली असली तरी सातारा शहरात पूर नाही. कमीजास्त प्रमाणात पाऊस असला तरी पालिकेने मोका साधत रस्त्यावर खडी मुरूम टाकत खड्ड्यांचे पॅचिंग करण्याची तयारी केल आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अशी खडी व मुरूमाचे ढिग दिसू लागले आहेत. खड्डे मुरूमाच्या रस्त्यांचा साताऱ्यातील हा प्रयोग नवा नाही. त्यालाही मोठा इतिहास आहे.
पाटण, कऱ्हाड तालुक्यात तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजविला आहे. सातारा शहराला पुराचा धोका नाही. तसा सातारकरांना कोणताच धोका नाही. संततधार पाऊस पडत राहतो. तरी पावसाचे पाणी डोंगरउताराने वाहून जाते. पुराच्या संकटात मदत करण्यासाठी एनडीआरएफसारख्या किंवा इतर सामाजिक संस्था धावून येतात. अर्थाच साताऱ्यासारख्या ठिकाणी अशा मदतीची गरजच भासत नाही. तिकडील लोकांना सुरक्षिततेसाठी पुरातून मार्ग काढावा लागतो. साताऱ्यातील लोक खड्ड्यांतून आणि अर्धवट भरलेल्या डबक्यातून मार्ग काढत राहतात. नगरपालिकेच्या कृपेने छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जात मोठ्या कौशल्याने सातारकर खड्डे चुकवत झिगझॅग नक्षी रंगवत वाहतूक सुरू ठेवतात.
शहर ऐतिहासिक, खड्डे ऐतिहासिक, डबकी ऐतिहासिक आणि इथं जगणारी माणसंही तशीच. सहनशील “ठेविले तैसेची अनंत राहवे,’ या उक्तीप्रमाणे वर्षानुवर्षे जगणारी. बरं, शहरात रस्ते तयार होत नाहीत, असेही नाही. रस्त्याचा इतिहास दरवर्षी नव्याने घडवला जातो. कारण ते इतके तंदुरूस्त असतात की दुसऱ्या वर्षी पुन्हा ते बनवावे लागतात. शहरातील कोणत्याही रस्त्यावरून तुम्ही सुरक्षित जाऊ शकता. कारण गुळगुळीत रस्त्यावरून अपघाताची शक्यता वाढते. प्रत्येक रस्त्यावरील खड्डे तुम्हाला अधिक सशक्त बनवितात. पावसाळ्यात या खड्ड्यांत पाणी साठते. डबकी तयार करण्याची ही कृती या शहरात अधिक कौशल्यपूर्णरित्या बनवली आहे. त्यासाठी इथले लोकप्रतिनिधी आणि अधिकारीवर्ग नेहमीच तत्पर राहतात.
दरवर्षी रस्ते तयार करण्याची मुदत सर्वसाधारणपणे 15 मे पर्यंत असावी, असा नियम सर्वत्र असतो. साताऱ्याला तो लागू नाही. पावसाळा तोंडावर आला की जूनमध्ये पालिकेला अशा कामांचीं आठवण आल्याशिवाय राहत नाही. लगबगीने कामे उरकली जातात. तेवढ्यात पाऊस सुरू होतो. त्यामुळे काम करणाऱ्यांचाही नाईलाज असतो. त्यावेळी जसे रस्ते तयार होतात. तसेच ते वर्षभर चालतात. त्यामुळे पावसालाही काही कळत नाही. तो वेड्यासारखा पडत राहतो. रस्त्यावर खड्डे तयार करतो. खड्ड्यात डबकी तयार होतात. त्यात पालिकेची चूक आहे, असा ओरडा काही लोकं उगाचच करतात. बरं, लोकांची तशी काही तक्रार नसते. ते आपले निमूटपणे आपले वाहन सांभाळत खड्डे चुकवित मार्गक्रमण करीत राहतात.
लोकांचे मणके ढिले झाले तरी ते शांतपणे डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतात. वाहनांचा तर प्रश्नच नाही. लोकांना बोलता येते म्हणून त्यांना होणाऱ्या दुखापती समजतात तरी. मुक्या वाहनांच्या वेदना अबोलच राहतात. तरीसुद्धा पालिकेला काळजी वाटत राहते. मग ऐन पावसात खडी आणून रस्त्याकडेला ओतली जाते. एखाद्या डंपरमधून मुरूम आणून टाकला जातो. पाऊस सुरू असल्यामुळे झटकन खड्डे भरण्यातही अडचणी असतात. मग खडी आणि मुरूम काही दिवस पडून राहिल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्याच्या लक्षात येते की अरे ते काम राहिलेच आहे. मग तो येतो. खडी आणि मुरूम खड्ड्यांची जागा भरून काढतो.
एखादा दिवस लोकांनाही बरे वाटते. पावसाला मात्र कळतच नाही. तो पुन्हा बरसत राहतो. खडी मुरूम वाहून नेतो. काही खड्डे एवढे मोठे असतात की छोट्या मोठ्या अपघातांची त्याला सवयच लागून जाते. स्टेडियमजवळच्या खड्ड्यात तर एका महिलेची दुचाकी मधूनच मोडते. एखादा टेंम्पो पलटीही होतो. खड्ड्याला मात्र काहीच त्रास होत नाही. इतकी काळजी त्या खड्ड्याची इतरत्र कुठेही घेतली जात नसावी. एखाद्या शहराच्या इतिहासातून इतर अनेकजण काही बोध घेत असतात.
सातारा पालिकेकडून घडविल्या जाणाऱ्या या खडी मुरमाचा इतिहास असाच अनुकरणीय आहे.
नेमेची येतो पावसाळा याची कल्पना असल्यामुळे दरवर्षी त्याच पद्धतीने खडी, मुरूमाच्या मुलाव्याने इथले रस्तेही अधूनमधून सजत राहतात. ही सजावट शहराला साजेसी बनते. त्याशिवाय काटकसरही मोठीच होते. म्हणजे रस्त्यासाठी मोठा निधी आला असे जाहीर होत असते. प्रत्यक्षात तसे रस्ते दिसत नसल्यामुळे या निधीची बचतही होत असणारच. म्हणूनच या खडीमुरूमाचा प्रयोग खूप महत्त्वपूर्ण आहे. परदेशात रस्त्यांच्या कामाबात मोठे संशोधन होत असल्याचा गवगवा होतो. कुठे टाकाऊ प्लॅस्टिकपासून रस्ते बनतात. कुठे आणखी कशापासून. पण खडी मुरूमापासून स्वस्तात स्वस्त रस्त्यांच्या उपायाचा प्रयोग मात्र दुर्लक्षित राहतो.