पुणे -पुणे शहरात नोकरीसाठी आलेल्या नगर जिल्ह्यातील तरुणीला प्रियकराने आठच दिवसांत लग्नाच्या आमिषाने दिल्ली येथे पळवून नेले. यानंतर तिच्या डोळ्यांना पट्टी बांधून तिला अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. तरुणीने तिचे शेवटचे लोकेशन मित्राला पाठवल्यावर मित्राने चंदननगर पोलीस तक्रार दाखल केली.
याप्रकरणी जयेश प्रभाकर भरसट (23, रा. चंदननगर) यानी तक्रार दिली आहे. अपहरण झालेली 22 वर्षीय तरुणी आठ दिवसांपूर्वीच पुण्यात नोकरीनिमित्त राहायला आली होती. ती वडगाव शेरीतील शिवबालाजी पी.जी. येथे वास्तव्यास होती. तिने 29 मे रोजी रुममेट तरुणीला फोन करुन “प्रियकर सैफ याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणले असून त्याचे यापूर्वीच लग्न झाले आहे. त्यामुळे मी परत येत आहे,’ अशी माहिती दिली. परंतु, ती परत आली नाही. दरम्यान पाच जून रोजी तिने पुन्हा एका रुममेटला फोन करुन सांगितले की, “सैफने डोळ्याला पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी आणले आहे. तेथे बरेच लोक आहेत, मी तुला गुपचुप लोकेशन पाठवले,’ असे सांगत नोएडा-दिल्ली येथील लोकेशन पाठवले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे करत आहेत.
अपहरण झालेल्या तरुणीच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला आहे. तरुणी आठ दिवसांपूर्वीच पुण्यात राहायला आली होती. यामुळे रुममेट आणि कंपनीतील सहकाऱ्यांना तिच्याबद्दल जास्त काही माहिती नाही. ती प्रेमप्रकरण असलेल्या तरुणाबरोबर गेल्याचे, प्राथमिक तपासात दिसत आहे. तपास पथकाकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
– राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर