उरुळी कांचन – पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाघोली, वाडे बोल्हाई या ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर शहरी भागातील नागरिकांनी कब्जा केल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना ऍपवर शहरी भागातील नागरिकांचेच नंबर लागत असल्याने, ग्रामीण भागातील नागरिकांत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
पूर्व हवेलीमधील चार लसीकरण केंद्रांवर स्थानिक नागरिकांना लस मिळणार नसेल तर वरील चारही लसीकरण केंद्रे ताबडतोब बंद करण्यात यावीत, अशी मागणी उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन व उपसरपंच संचिता कांचन यांनी हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्याकडे केली आहे. पुढील दोन दिवसांत वरील चारही लसीकरण केंद्रांवर स्थानिक नागरिकांना लस उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर आणि सरपंच संतोष कांचन यांनी दिला आहे.
18 ते 44 वर्षांमधील लोकांना करोना लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असल्याने, नागरिकांना वॉक – इन किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून लसीकरण देणे बंद आहे. याचाच फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. उरुळी कांचन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, वाडेबोल्हाई वाघोलीसह पूर्व हवेलीमधील चारही लसीकरण केंद्रांवर 98 टक्के बाहेरचे नागरिक लसीकरण करून घेत आहेत.
लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरिकांना लस मिळत नसल्याने, नागरिक संतप्त झाले आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड हद्दीतील नागरिक या ठिकाणी गर्दी करीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना नाव नोंदविण्याची संधीच मिळत नाही, यामुळे या भागातील नागरिक लसीपासून वंचित राहात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना लस मिळावी यासाठी ऍपमध्ये सुधारणा करावी, अथवा ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रे बंद करावीत अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
– संतोष कांचन, सरपंच, उरुळी कांचन