वाई – नागरिकत्व सुधारणा कायदा देशहिताचा आहे. बाहेरच्या देशातील अल्पसंख्याक लोकांना आपल्या देशात नागरिकत्व देण्यासंबंधीचा हा कायदा असून या देशातील नागरिकांचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. या कायद्याबाबत राजकारण करून व अफवा पसरवू नयेत, असे आवाहन माजी सहकारमंत्री व भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
वाईतील लोकमान्य टिळक ग्रंथसंग्रहालयात भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 बाबत आमदार देशमुख बोलत होते. याप्रसंगी दि वाई अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अनुप सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, शहराध्यक्ष राकेश फुले, लोकमान्य स्मारक संस्थेचे अध्यक्ष प्रा. सदाशिव फडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार देशमुख म्हणाले, “”नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये भारताच्या नागरिकांचा म्हणजे देशातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द किंवा अन्य कोणत्याही धर्मातील लोकांचा काहीही संबंध नाही, फक्त भारताच्या शेजारच्या देशांतून आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यासंदर्भात हा कायदा आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक निर्णय देशहिताचे घेतले आहेत. त्यांचे नाव जागतिक पातळीवरील नेत्यांमध्ये होऊ लागलेले आहे.
त्याला कुठेतरी राजकीय हेतूने प्रेरीत होऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याचा कोणताही कायदा नाही. मुस्लिमांच्याबाबतीत तर जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून अपप्रचार करण्याचे काम सुरू आहे. हे चुकीचे आहे. हा देश समृध्द व वैभवशाली करायचा असेल, देशाच्या हितासाठी सर्व सूज्ञ नागरिकांनी या कायद्याचा अभ्यास करून देशाला पुढे न्यायला पाहिजे. देशाच्या, समाजाच्या हिताचा हा कायदा आहे.” भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत लेले यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी काशीनाथ शेलार, अजित वनारसे, देवानंद शेलार, दि वाई अर्बन बॅंकेचे संचालक मदनलाल ओसवाल, विद्याधर तावरे, अनिल देव, माजी अध्यक्ष कांतीलाल जैन, लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे पदाधिकारी वसंतराव बोपर्डीकर, विवेक पटवर्धन, डॉ. चिंतामणी केळकर, प्रवीण जगताप व वाईतील मान्यवर उपस्थित होते.