नगर – कायदा हा वाईट नसून त्याचा उद्देश, हेतू समजून घेतल्यास त्याची महती लक्षात येते असे सांगून नागरिकत्व सुधारणा कायद्याचा अभ्यास न करता विरोध करणे ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी केले.
जिल्हा गुरूकुल शिक्षक मंडळ, प्राथमिक शिक्षक समिती गुरूकुल सांस्कृतिक समिती, गुरुकुल महिला आघाडी, ऊर्दू शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक समितीच्यावतीने आयोजित गुरूकुल प्रतिभाविष्कारातील शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आमदार लहू कानडे होते. आमदार बबनराव पाचपुचे, अभिनेता मोहिनीराज गटणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निकम पुढे म्हणाले,आम्ही कायद्याची भाषा बोलतो आणि साहित्यिक ही काळजाची! कायदा हा वाईट नसतो. तो नेहमीच चांगला असतो. त्याचा उद्देश, हेतू जेव्हा समजून येतो तेव्हा त्याची महती लक्षात येते असे सांगून नागरिकत्व सुधारणा कायदा किती जणांना माहिती आहे? असा प्रश्न करून ऍड. उज्ज्वल निकम यांनी त्याकडे लक्ष वेधले. सभागृहातील एकानेच हात वर केला. त्यावर ते म्हणाले, ही शोकांतिका आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर त्यावर टीका केली पाहिजे. अभ्यास नसेल, तर त्यावर टीका करणे चुकीचे आहे की बरोबर याचा देखील अभ्यास केला पाहिजे. या कायद्याचा धर्माशी संबंध आहे का हे देखील अभ्यासले पाहिजे.
चुकांची पुनरावृत्ती करणे हे मुर्खपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणून त्यांनी समाजात, देशात जेव्हा ज्वलंत प्रश्नावर चर्चा होत असते तेव्हा शिक्षकांनी त्यावर अभ्यास करून पूर्णपणे बोलले पाहिजे. सामाजिक शांतता, सलोख्याला जेव्हा धोका निर्माण होतो, त्यावेळी शिक्षकांची जबाबदारी समाजाप्रती वाढते, असेही ते म्हणाले. शिक्षकांना खरच अशैक्षणिक कामांचा बोजा असले आणि त्याचा गुणवत्तेवर परिणाम होत असेल, तर त्याची कैफियत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारसमोर मांडले, असे आश्वासन राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी दिले. ते म्हणाले, मतदान नोंदणी हे काम खरच अशैक्षणिक असेल आणि त्याचा शैक्षणिक कामावर परिणाम होणार असेल, तर ती बाब गंभीर आहे.
याबाबत मी मुख्यमंत्री यांच्यासमोर शिक्षकांची बाजू मांडले. परंतु त्यापूर्वी शिक्षकांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून आपण किती मनापासून काय-काय काम करतो, ही पडताळणी करावी. घरात, शेतात आपण काम करतोच ना. शिक्षक हा सर्वांना आवडतो. कारण तो दुसऱ्यांचे ऐकत असतो. सांगितलेले काम करतो. त्यामुळे मतदान नोंदणीचे काम तुम्हाला दिले जाते, असे ऍड. निकम म्हणताच सभागृहात हशा पिकला. ऍड. निकम म्हणाले, मुख्यमंत्री यांच्यासमोर कैफियत मांडताना, ती पूर्ण होईलच असे नाही. चर्चा करेल, त्याचा पाठपुरावा करेल. तसा मार्ग निघेल.