– मुकुंद ढोबळे
जादा व्याजदराचे आमिष, तीस दिवसांत रक्कम दीड पट, कमी दरात सोने, नोकरीचे आमिष अशी वेगवेगळी आमिषे केवळ नागरिकांना भुरळ घालतात; परंतु ही आमिषे म्हणजे केवळ फसवणूक आहे. हे अनेकांना समजले असले तरी पुन्हा हेच प्रकार घडत असल्याने, नागरिकांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे.
शिक्रापूरमध्ये जास्त व्याजाने पैसे देतो म्हणून झालेली चारशेहून अधिक कोटीची फसवणूक, करडे येथे अशाच प्रकारे झालेली नऊ ते दहा कोटींची फसवणूक, आणि आता मांडवगण फराटा, वडगाव रासाई परिसरात झालेली सात कोटी 96 लाखांची जास्त परतावा देतो म्हणून झालेली फसवणूक यामागे असे अनुभव असतानाही नागरिक जास्त परतावा देण्याच्या “भुलभुलैया’ फसतो कसा? हा प्रश्न कायम असून फसवणूक झाल्यावर सगळ्यांना समजते. शिरूर शहरात काही दिवसापूर्वी पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने फसवणूक केली तर बाबुरावनगर शिरूर येथे एकाने असेच लोकांना गंडवले होते. शिरूर तालुक्यात औद्योगिकीकरण व मोठ्या प्रमाणात झालेले सिंचन यामुळे बागायती शेती व मोठ्या प्रमाणात मिळालेला रोजगार व व्यवसाय यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या खिशात मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे.
शिरूर तालुक्यात पैशाला किंमत राहिली नाही. एखाद्या किरकोळ कारणासाठी लाखो रुपयांची उधळण सहज केली जाते. या अगोदर तळेगावचा नितीन नरके याने जिल्ह्यातील नागरिकांना महिन्याला दहा टक्के व्याजदर देऊन शेकडो कोटींची फसवणूक केली. त्यातच अनेक राजकीय नेत्यांपासून ते रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी व्याजाने पैसे घेते. काहींनी घरदार गहाण ठेवून पैसे गुंतवणूक केली होती. त्यात सर्वांची फसवणूक झाली तरीही या तालुक्यातील नागरिक शहाणा झाला नाही. दीड वर्षापूर्वी एकाने करडे येथील नागरिकांना तीस दिवसांत रक्कम दीडपट करून देतो, असे आमिष दाखवत या लोकांचा विश्वास संपादन करून जवळपास या लोकांना दहा कोटीच्या आसपास फसवणूक केली आहे. त्याच बरोबर शिरूर शहरात असेच एका वयस्कर महिलेने पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून येथील नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
नुकतेच शिक्रापूर परिसरात नोकरीला लावतो म्हणून काही बेरोजगार तरुणांना तीन कोटीच्या आसपास फसवले असल्याने उघड झाले आहे. यासाठी लालची वृत्ती कमी करणे महत्त्वाचे आहे; परंतु चुकणार तो माणूसच! असे म्हणणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यासाठी जादा पैशाचा मोह टाळा. कष्टाने कमावलेले पैसे, शेती, सावकार, उसणवारी करून पालक हे पैसे गोळा करतात ते भरताना त्याबाबत सतर्कता पाळायला हवी, जिथे नोकरभरती आहे तिथे चौकशी करावी, अन्यथा कोणीच तुमच्या मदतीला येऊ शकणार नाही.