नगर – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सारख्या अनुभवी व्यक्तीला नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने संधी दिली तर निश्चितच नागरिकांनाही आनंद होईल, असे धाडसी भाष्य भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना केले. ते पुढे म्हणाले की, त्यांना उमेदवारी दिली तर लोकसभेची निवडणूक स्पर्धात्मक व रंजक होईल.
केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी नाईन ही विशेष जनसंपर्क मोहिम भाजपने हाती घेतली आहे, त्याची माहिती खा. विखे यांनी माध्यमांना दिली. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, दिलीप भालसिंग, सचिन पारखी, वसंत लोढा, उपस्थित होते.
आ. थोरात यांच्या संभाव्य लोकसभा उमेदवारीबाबत बोलताना खा. विखे म्हणाले, थोरात यांचे पक्षाचे काम व कार्य पाहता पक्षाने त्या दृष्टिकोनातून त्यांच्या नावाचा विचार केला असेल तर त्याचे स्वागत करणे व त्याला नकार देण्याचा अधिकार मला नाही, मी काही कॉंग्रेसचा प्रवक्ता नाही, पण कॉंग्रेस पक्षाने त्यांना संधी दिली तर नगर जिल्हा त्याबाबत काय विचार करतो व भाजपचा उमेदवार कोण राहते यावरून त्यांचा निर्णय होऊ शकतो. थोरतांसारख्या अनुभवी माणसाला कॉंग्रेसने संधी दिली तर निश्चितच नागरिकांना आनंद होऊ शकतो आणि नगर दक्षिणेची निवडणूक स्पर्धात्मक व रंजक होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
जातीय तणावाच्या संगमनेरला दोन-तीन घटना घडल्या आहेत, शेवगावची दंगलही पूर्वनियोजित होती की नाही, हे पाहिले पाहिजे. मात्र, आता सर्व धर्मीयांच्या मिरवणुकांचे पारंपरिक मार्ग बदलले पाहिजे. प्रत्येक मिरवणूक गल्लीबोळात व बाजारपेठेतच गेली पाहिजे का, यावर चर्चा अपेक्षित आहे. प्रत्येकाने सण साजरा करताना संयम ठेवला पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही. शेवगाव प्रकरणात हिंदुत्ववादी व भाजपच्या लोकांवर अल्पवयीन मुलांनी दगडे फेकले आहे, त्यावर मार्ग काढावा लागेल व गृहमंत्र्यांद्वारे याबाबत स्वतंत्र कायदा करावा लागेल.
मिरवणुकातून औरंगजेबाचे फोटो झळकावणे, हे पोलिसांना उशिरा कळले आहे. काही पोलीसही त्यात सहभागी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलिसांनी आता कोंबिंग ऑपरेशन करून आरोपींना पकडावे,असे ते म्हणाले. आता पक्षात कोणीही मागे राहून चालणार नाही, सर्वांना पुढे जावे लागेल. पावले मागे टाकून उपयोग नाही, पक्षाला घेऊन पुढे जाताना विकासाची पावले पुढेच पडली पाहिजे, असे मिश्किल भाष्य करून विखे- शिंदे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.